वासोट्याच्या जंगलात..
वासोट्याच्या जंगलात..
काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.
इतिहास : वासोटा किल्ला प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वरिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल असे मानले जाते की, वरिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला. सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनीत्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ‘वरिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा ’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ‘वंसतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते. पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर सल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडवर अडकलेले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताली तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे.
दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो . समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणाई वाटा किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचील पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. याच माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाटा जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते. या कड्याचा आकार इंग्रजी ‘ण’ अक्षरा सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय.जुना वासोटा नव्या वासोट्याच्या बाबुकड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाटा अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचीही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदेही असल्याने सहसा येथे कोणी जात नाही
(सोर्स - मायमराठी)



Comments
Post a Comment